Friday, August 15, 2014

यांच्या स्वातंत्र्याचं काय ?

15 ऑगष्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीशानी जखडलेल्या गुलामीच्या बेड्या आपण तोडल्या. दरवर्षी 15 ऑगष्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे हे मान्यच....परंतु हे स्वातंत्र्य खरोखर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचलय का याचा विचार समस्त भारतीयानी करावा असे मला वाटते. आजही अनेक लोकाना रहायला निवारा नाही, अनेकाना गाव नाहे, या देशाचे नागरिक असल्याची त्यांची कोणतीही ओळख नाही. या गावकुसाबाहेरच्या,
परिघाबाहेरच्या समाजाला न्याय मिळावा, त्याना खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपण काय करणार आहोत ? किमान आजच्या दिवशी तरी असले फालतू प्रश्न विचारु नये असे सर्वाना वाटेल. परंतु आजच सिग्नलला तिरंगा झेंडा विकणारी लहान मुलं पाहीली आणि रहावले नाही. फूटपाथवरच संसार मांडून ते आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत होते ? मनात विचार आला, कोण असतील ही माणसं ? याना घर नाही का, गाव नाही का ? याना नातेवाईक नाहीत का ? यांच्या मुलांचे भविष्य काय ? हे सारे प्रश्न मनाला यातना देवून गेले ? अनेकजण मखलाशी करतात कि याना कष्ट करायला काय होते ? परंतु ही सर्व माणसं कष्ट करतच होती ? कोण तिरंगा विकत होतं, कुणी फुगे विकत होतं, कुणी आणखी काय काय विकूनच आपला उदरनिर्वाह करीत होते. पण या अवाढव्य भारत देशात त्याना रहायला हक्काची जागा मिळू नये ? त्याना या देशाचे नागरिक म्हणून स्वाभिमानाने जगता येवू नये ?
------------------------
चार दिवसापूर्वीच एक बातमी वाचायला मिळाली. नागपूर जिल्ह्यामधील  एका ग्रामपंचायतीने गावातील वडार समाज गुन्हेगार आहेत असा ठराव मंजूर करुन त्याना गाव सोडण्याचे आदेश दिले. सरपंचपदी एक महिला असून त्यांचे म्हणने आहे कि गावातील वडार समाज गुन्हेगार आहे. शासनाने त्याना कुठेही जागा द्यावी पण त्यानी गाव सोडून जावे. 
-----------------------
असो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.......

प्रकाश पोळ.

0 comments: