Wednesday, February 9, 2011

मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग २

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी ‘विश्वाचा यशवंत नायक’ मासिकाच्या जानेवारी २००८ च्या अंकात लिहिलेला परखड लेख ..... मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा  भाग २ 

१९४८ साली डॉ. आंबेडकर यांनी लखनौ येथे Backward Classes च्या सभेत ओबीसी ना आवाहन केले होते, “Why not you Backward Class & we scheduled class should come together and capture the political power of India. ”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Annihilation of Cast  मध्ये ‘ब्राम्हणी हिंदुइझम’ मांडण्याचे सामर्थ्य केवळ भारतातील ब्राम्हणी-अहिंदू-आदिवासी मधेच आहे, असे डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले होते. गेल्या ६० वर्षात तथाकथित डाव्या आणि संघीय NGO नी आदिवासींना नेस्तनाबूत करणेच बाकी ठेवले आहे. आणि फुले-शाहू-पेरियार-नारायण गुरु सारख्या महामानवांना जन्म देणारा ओबीसी हा परिवर्तनवादी चळवळीपासून लांब गेला. याची कारणे शोधून त्यावर उपाय शोधल्याशिवाय ओबीसी, आदिवासी तसेच एस.सी. चे खरे हित होणार नाही हे किमान चळवळीचे म्होरके म्हणवणाऱ्यानी तरी समजून घेण्याची गरज आहे.

मा. महादेव जानकर
भारतात फुले-शाहू-आंबेडकर अशी एक परंपरा आणि एक आघाडी आहे. तशीच मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर यांचीही एक परंपरा आणि आघाडी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार करणारी मानवतावादी परंपरा आणि मानवी मुल्यांचा विरोध करणारी मनुवादी परंपरा यामध्ये कैक वर्षापासून लढा चालू आहे. यामध्ये मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर परंपरा मजबूत झाल्याचा पुरावा ठायी-ठायी नजरेला येतो. डॉ. आंबेडकरांचे नाव व नावासहीत थोडा वारसाही जिवंत ठेवण्यात दलित यशस्वी झाले आहेत. परंतु फुलेंचे नाव आणि वारसा दोन्हीही जिवंत करण्याची गरज आहे. आदिवासींना बरोबर घेणारी चळवळ राबवण्याची गरज आहे. भारतातील दलित-ओबीसी-आदिवासीसहित धार्मिक अल्पसंख्यांक एकत्र घेवून जाणारी चळवळ बांधण्याची गरज आहे. सामाजिक चळवळीला मर्यादा येतात. काही काळ त्या टिकतात. राजकीय चळवळीतून मात्र सामाजिक चळवळीला गती येवू शकते. ती जास्त काळ टिकू शकते. ही राजकीय चळवळ प्रस्थापित राजकीय चळवळीपासून अलिप्त-स्वतंत्र असली पाहिजे. काशीराम आणि बसपा ने हा प्रयोग यशस्वी करून दाखवल्याचे दिसते. बहुजन राष्ट्रीय समाज मोठा आहे. भारताच्या ९० % त्यांची संख्या आहे. मनुवादी व्यवस्थेकडे ही मते मिळवण्यासाठी वेगवेगळया ‘मुखवट्याचे’ अनेक पक्ष आहेत. (काँग्रेस, भाजपा, शिवसेना). मानवतावादी मुखवटा धारण करून ‘मनुवादी’ कार्य करणाऱ्या संघटनाही यांच्याकडे आहेत. बसपा ही दलित-बेस पार्टी आहे. मनुवादी राजकारणाला शह देण्यासाठी ‘ओबीसी-आदिवासी’ राष्ट्रीय समाज पार्टीची स्थापना मी केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचा झेंडा धरणाऱ्या ब्राम्हणानाही माझ्या पक्षात स्थान आहे. रासपा ओबीसी-आदिवासी समाज घटकाइतकीच दलित-अल्पसंख्यांकाची पार्टी आहे.

रासपा ‘राष्ट्रीय समाज’वादी असली तरी सर्व भाषीय, सर्व प्रांतीय, सर्व प्रादेशिक, सर्व धर्मियांना ‘समान’ लेखणारी, सन्मान बाळगणारी, त्यांच्या समस्यांना आपली समस्या मानणारी पार्टी आहे. रासपा जात-धर्म-भाषा-प्रांत निरपेक्ष पार्टी आहे. संघटनात्मक लोकशाही मानणारी पार्टी असल्याने पक्ष वाढीसाठी समाज हितासाठी आवश्यक बदल स्वीकारणारी, तसं बदल घडवून आपल्या कार्यकर्त्यासाठी पूर्ण वाव आणि स्वातंत्र्य देणारी पार्टी आहे.

रासपा मानवतावादी पार्टी आहे. फुले-शाहू-आंबेडकरांची परंपरा मानणारी पार्टी आहे. २०० पेक्षा जास्त राष्ट्रीय महापुरुषांचा आदर्श घेवून चालणारी पार्टी आहे. मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर परंपरांशी लढा देण्यासाठी सज्ज असलेली पार्टी आहे. भारताच्या राज्य घटनेमुळे निवडणूक लढवून भारताची सर्वोच्च सत्ता घेण्याची संधी मिळाली आहे. मत अधिकार नावाचे सर्वात मोठे शस्त्र ९० % राष्ट्रीय समाजाच्या हातात आहे. परंतु भारताच्या राजकीय पटलावर अनेक मनुवादी पक्षच पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. काही मानवतावादी पक्ष दिशाहीन झाल्यामुळे, विकले गेले, वा दुबळे झाले आहेत, होत आहेत. काही पक्ष आजही प्रामाणिकपणे लढत आहेत.

राष्ट्रीय समाज पार्टी देखील स्पष्ट ध्येय, लक्ष समोर ठेवून आपल्या समाजाच्या, राष्ट्रीय समाजाच्या आधारावर मुंबई-दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्याचा इरादा घेवून लढत आहे. निर्णायक पहिले पाऊल यशस्वी टाकले आहे. ‘येल्डा’ pattern द्वारे दुसरे यशस्वी पाऊल टाकले आहे. दिल्लीच्या संसद भवनात ‘राष्ट्रीय समाजाचा’ आवाज बुलंद करणार आहे.

मनु आणि मानवाचा तसा डिक्शनरी अर्थ एकच आहे. परंतु सामाजिक, सांकृतिक संदर्भ लक्षात घेता मनुवाद आणि मानवतावादी हे शब्द परस्पर कट्टर विरोधक बनले आहेत. तात्पर्य नावापेक्षा अर्थ महत्वाचे आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष नावापेक्षा अर्थ घेवून पुढे जाणारा राजकीय पक्ष आहे.

Monday, February 7, 2011

मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग १

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी ‘विश्वाचा यशवंत नायक’ मासिकाच्या जानेवारी २००८ च्या अंकात लिहिलेला परखड लेख ..... मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग १ 

मा. महादेव जानकर
“Buffalo Nationalism” चे लेखक कांचा इलय्या २१ सप्टेंबर २००७ रोजी मुंबईत आले होते. “Reservation & Globalization, Myths & Truths” या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. धनगर समाजाच्या कांचा इलय्या यांनी ब्राह्मणवादी “Cow Nationalism” ची मांडणी केली. आणि भारतभर खळबळ उडवून दिली. तत्पूर्वी “Why I am not Hindu ?” हा ग्रंथ लिहून त्यांनी खळबळ माजवली होती. आई, वडील, बहिण निरक्षर असलेल्या कुरमा या धनगर समाजात जन्माला आलेले कांचा इलय्या भारतातील पहिल्या तीन सर्वश्रेष्ठ इंग्रजी लेखक, विचारवंत मधील एक मानले जातात.

जागतिकीकरणा बरोबर येणाऱ्या Cultural आणि Spiritual बदलामुळे दलित बहुजनांचा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गोतम बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, कार्ल मार्क्स आणि डॉ. आंबेडकर हे जगातील पाच प्रेषित (Prophet) असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कांचा इलाय्यांनी डॉ. आंबेडकर यांना गोतम बुद्ध या जगातील पहिल्या महापुरुषानंतरचा भारतातील दुसरा आणि जगातील पाचवा आणि अखेरचा महापुरुष मानला आहे. डॉ. आंबेडकरांचे कर्तुत्व आणि नेतृत्व महान होते हेच यातून प्रत्ययाला येते.

डॉ. आंबेडकर ज्ञानाचे सागर होतेच. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय लढ्याचे ते सर्वश्रेष्ठ सेनापतीही होते. डॉ. आंबेडकरांचा जसा अपमान झाला तसा पूर्वी अनेकवेळा अनेकांचा झाला होता. आजही होत आहे, परंतु आंबेडकर एकच पैदा झाले. त्या अपमानातून ‘आत्मभान’  आलेल्या डॉ. आंबेडकरांनी दैदिप्यमान कार्यकर्तुत्वाद्वारे (जादूच्या कांडीने नव्हे) कोट्यावधी अस्पृश्यांचा उद्धार केला. वंचित समाजाचा लढा कसा लढवावा याचा सर्वोत्तम आदर्श समोर ठेवला. शूद्र, ओबीसी, आदिवासी यांच्यासाठी वा कोणाही वंचित समाजासाठी हा लढा सर्वोत्तम आदर्श ठरतो. परंतु दलीतांसह ओबीसी, आदिवासींना हा आदर्श पेलता आला नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. पहिल्या किंवा दुसऱ्या जागतिक महायुद्धापेक्षा मोठे युद्ध डॉ. आंबेडकर हे भारतातील ब्राह्मणवादी, भांडवलवादी आणि सरंजामवादी व्यवस्थेविरुद्ध लढले. किंबहुना त्यांना मागे सरले. भारताच्या इतिहासात गोतम बुद्ध आणि सम्राट अशोकानंतर एवढे मोठे सामाजिक युद्ध कुणी लढले नाही. पशुतुल्य अस्पृश्यांना माणसाचे अधिकार मिळवून देणे हा एक चमत्कारच होता. त्यामुळे डॉ. आंबेडकर दलितांचे देव बनले तर त्यात नवल नाही. विज्ञानवादी दृष्टीकोन आणि बौद्ध धम्ममतामुळे हिंदू मानसिकतेच्या देवत्वाचे स्वरूप आलेले नसले तरी डॉ. आंबेडकरांना महामानव मानले जावू लागले.

व्यक्तीपुजेतून ब्राम्हणवादाला बळकटी मिळते असे सांगणाऱ्या डॉ. आंबेडकरांना माणूस म्हणून कोणाच्याही कार्याचे मूल्यमापन केले जावे असे अभिप्रेत होते. माणूस मोठा नसतो. येथून-तेथून माणूस सारखाच असतो. कामाने माणूस छोटा-मोठा ओळखला जातो असे आंबेडकरांचे म्हणणे होते. कार्याने कोणीही मोठा होवू शकतो हेच बुद्धांचे आणि आंबेडकरांचे मुख्य तत्वज्ञान होते. या अनुषंगातून कोणत्याही माणसाचे, मोठ्या मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या जीवन आणि चरित्राचे मूल्यमापन व्हावे. त्यामधून आपला जीवनमार्ग ठरवावा आणि चालवावा हेच डॉ. आंबेडकर या कार्यकर्तुत्वाने महान बनलेल्या महामानवाला अभिप्रेत होते. म्हणूनच डॉ. आंबेडकर म्हणतात ‘ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा (त्यात वेळ घालवण्यापेक्षा) मला अभिप्रेत असलेले कार्य करा.’ छ. शिवाजी महाराज असो, डॉ. आंबेडकर असो किंवा राजमाता अहिल्याबाई होळकर असो त्यांच्या अनुयायी वारसदारांनी काय केले, काय मिळवले यावर दृष्टीक्षेप टाकल्यास काय आढळते ? उपरोक्त महामानवानी जे मिळवले ते टीकवताही आले नाही असेच दिसते. उपरोक्त महामानवानी पेरले होते, वाढवले होते परंतु आम्हा वारसदारांना अनुयायांना ते नीट सांभाळून ठेवता आले नाही हे वास्तव आहे. यावर गांभीर्याने विचार करून कार्य करण्याची गरज आहे. पण असे का घडले ? फुले आणि फुलेवाद दोन्हीही विसरले गेले. परंतु डॉ. आंबेडकर विस्मृतीत गेले नाहीत किंबहुना त्यांच्या नावाचा भारतभर, जगभरात जयजयकार होत आहे. (अरुण शौरीसारखे काही कावळे ओरडले.) आरक्षण नावाचे साधन वा शस्त्र जपण्यासाठीच दलित चळवळीची ९९ % दमछाक होत आहे, उरलेले १ % धार्मिक आणि सांकृतिक कार्यात गुंतलेले आहेत.