Monday, August 18, 2014

धनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया


धनगर समाजाचे 14 ऑगष्ट रोजीचे महाराष्ट्रव्यापी आंदोलन खूप यशस्वी झाले. संपूर्ण राज्यात हे आंदोलन शांततेत पार पडत असताना बारामती, सातारा आणि फलटण या ठिकाणी काही हिंसक घटना घडल्या. बारामती आणि फलटण येथे काही एस. टी. गाड्यांची तोडफोड झाली तर सातारा येथे राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर एका कार्यकर्त्याने अबिर-बुक्का टाकला. राज्यभर इतर ठिकाणी मात्र आंदोलन शांततेत पार पडले. वास्तविक पहाता कोणतेही आंदोलन लोकशाही मार्गाने आणि घटनेच्या चौकटीत राहूनच करायला पाहिजे. परंतू विविध
प्रश्नावर होणारी आजपर्यंतची आंदोलने पाहिली तर अपवादात्मक ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या दिसतात. महात्मा गांधीनी स्वातंत्र्याच्या प्रश्नासाठी सुरु केलेले असहकार आंदोलन चौरीचौरा घटनेनंतर तहकुब करावे लागले. गांधीजीनी अहिंसक मार्गाचा अवलंब केला असला आणि आंदोलनाची दिशाही याच पद्धतीने निश्चित केली असली तरी लोकांचा रोष एवढा प्रचंड होता कि चौरीचौरा येथे पोलिस चौकी जाळून एकवीस पोलीस म्रुत्युमुखी पडले. या हिंसक घटनेला गांधीजींचे समर्थन नसतानाही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हा आक्षेपार्ह प्रकार घडला. आजही महाराष्ट्र किंवा संपूर्ण देशभर होणारी आंदोलने पाहिली तर काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. मनसे, शिवसेना, शेतकरी संघटना, मराठा आरक्षण आंदोलन या सर्व ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या दिसतात.


धनगर समाजाचे आंदोलन चालू असताना राज्य सरकारने आंदोलकांची क्रूर थट्टा केली. समाजातील सोळा बांधव उपोषणाला बसले असताना राज्य सरकारचा प्रतिनिधी किंवा एकही प्रमुख नेता त्याना भेटायला गेला नाही. धनगरांची एस. टी. आरक्षणाची मागणी असताना मंत्रीमंडळाच्या बैठकीत तिसर्या सूचीचे घोडे दामटण्यात आले. आपली मागणी योग्य असतानाही राज्य सरकार घोर फसवणूक करत आहे ही कार्यकर्त्यांचे भावना बळावत होती. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यानी उलट सूलट वक्तव्ये करुन आरक्षणाबाबत गैरसमज निर्माण करायला सुरुवात केली. तालुका, जिल्हा पातळीवर चाललेल्या आंदोलनात सर्वच प्रस्थापित पक्षांचे नेते चमकोगीरी करुन जात होते. जिथे जिथे आंदोलन झाले तिथले स्थानिक आमदार, खासदार आंदोलनस्थळी येवून आरक्षणाला पोकळ पाठींबा देत होते. पण यातल्या एकानेही संसदेत किंवा राज्य विधीमंडळात धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला नाही. 

तिसर्या सूचीला राष्ट्रवादीचा विरोध असून धनगराना एस. टी. मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे, धनगर धनगड एकच असून त्यात दुरुस्ती झाली पाहिजे अशी राष्ट्रवादीची भुमिका असल्याचे शरद पवार यानी स्पष्ट केले. परंतु मंत्रीमंडळाच्या बैठकीत तिसर्या सूचीचा निर्णय एकट्या कोंग्रेसने घेतला का ? हा निर्णय घेत असताना अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या एकाही मंत्र्याने या निर्णयाला का विरोध केला नाही ? वास्तविक पहाता तिसर्या सूचीचे गाजर दाखवून आंदोलनाची धार कमी करता येईल असे सरकारला वाटले होते. परंतू याचा नेमका उलटा परिणाम झाला आणि धनगर समाज पेटून उठला. तेव्हा कुठे शरद पवाराना उपरती झाली आणि तिसरी सूची राष्ट्रवादीला मान्य नसल्याचा साक्षात्कार त्याना झाला.

या सर्व घडामोडीमूळे आपली फसवणूक झाल्याचे धनगर समाजाची भावना झाली. त्यामूळे कार्यकर्त्यांचा रोष बाहेर पडला आणि एक-दोन ठिकाणी हिंसक घटना घडल्या. सातार्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्या अंगावर मारुती जानकर यानी अबिर बुक्का टाकला. हा प्रकार निषेधार्ह मानायलाच हवा. मारुती जानकर याना पोलिसानी ताब्यात घेवून त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करायला हवी होती. परंतू घडले वेगळेच. शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यानी मारुती जानकर याना बेदम मारहाण केली. अगदी सिनेस्टाईल पद्धतीने हा राडा चालू असताना पोलिसानी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मारुती जानकर यानी बेदम मार खाल्ल्यानंतर पोलिसानी हस्तक्षेप केला आणि जानकर याना ताब्यात घेतले. इकडे बातमी वार्यासारखी सातारा शहरात पसरली आणि शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचे कार्यकर्ते एकत्र जमले. त्यानी धनगरांचा मोर्चा पोवईनाक्यावर अडवला आणि काही लोकाना मारहाण केली. अर्वाच्च्य भाषेत शिविगाळही केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यानी पोलिस स्टेशन्मध्ये घुसून जानकर याना बेदम मारहाण केली. 

इकडे धनगर समजातील एक कार्यकर्ते आणि आंदोलक हणमंतराव चवरे दिलगीरी व्यक्त करण्यासाठी शिवेंद्रराजेंच्या बंगल्यावर गेले. तिथे आधीच भरपूर कार्यकर्ते जमले होते. ज्या हणमंतराव चवरेंचा या घटनेशी संबंधही नव्हता त्यानाही राजेंच्या कार्यकर्त्यानी बेदम मारहाण केली. या सर्व प्रकारणात पोलिसांची भुमिका काय हा संशोधनाचा विषय ठरावा. 

मारुती जानकर यांच्याकडून जो.दुर्दैवी प्रकार घडला तो काही धनगर समाजाच्या नेत्यांच्या सांगण्यावरुन घडला नव्हता. तात्कालिक रागातून हा प्रकार घडला आणि त्यात शिवेंद्रराजे यांचे कपडे खराब झाले. या गोष्टीसाठी किती शिक्षा असू शकते ? कायद्याने जी काय शिक्षा असेल ती व्हायला हरकत नव्हती. परंतू सातार्यात कायदा, पोलिस नंतर. आधी राजे आणि त्यांची प्रजा. राजेंच्या कार्यकर्त्यानी मग जानकर आणि चवरे यांची यथेच्छ धुलाई केली. शिवेंद्रराजे यांच्यावर बुक्का फेकण्याच्या घटनेचा निषेध व्हायलाच हवा. परंतू कायदा हातात घेणार्या राजेंच्या कार्यकर्त्यांचा कुणी निषेध करायचा ? सातार्यात तरी असा निषेध करुन चालणार नाही. अन्यथा परिणामाना सामोरे जाण्याची तयारी हवी. मी मात्र या घटनेचा निषेध करतो. आम्हाला सोळाव्या शतकातली सरंजामदारी नको आहे. आम्हाला घटनेने दिलेली लोकशाही प्रक्रिया हवी आहे.

या घटनेचे वार्तांकण करताना दैनिक पुढारीने खूप चुकीची भूमिका घेतली. गणपतराव जाधवांचा वारसा सांगणार्या पुढारीने व्रुत्त देताना 'बेदम चोप दिला', 'धुलाई केली', 'हणमंतराव चवरेंचे भुस्काट पडले' अशा प्रकारची भाषा वापरली. बहुजन समाजाचा जयघोष करणार्या, पुरोगामीपणाचा डिंडोरा पिटणार्या पुढारीला ही भाषा शोभत नाही. तटस्थ राहून बातम्या देण्यापेक्षा विशिष्ट वर्गाच्या बाजूने लिखाण करण्यात पुढारी वाकबगार आहे. पुढारीचे पुरोगामीत्व आणि शरद पवारांचे पुरोगामीत्व यात काहीच फरक नाहे. ब्राह्मणेतर चळवळीपासूनचा इतिहास आहे कि बहुजन या संकल्पनेखाली आमची फसवणूक झाली. संघर्ष करायला बहुजनवादाची व्यापक व्याख्या आणि फायदे घेण्याची वेळ आली की बहुजन म्हणजे फक्त मराठा समाज ही संकल्पना घातक आहे. आणि इथून पुढे आम्हाला या फसवेगीरीपासून सावध रहावे लागणार आहे.

0 comments: