Wednesday, February 9, 2011

मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग २

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी ‘विश्वाचा यशवंत नायक’ मासिकाच्या जानेवारी २००८ च्या अंकात लिहिलेला परखड लेख ..... मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा  भाग २ 

१९४८ साली डॉ. आंबेडकर यांनी लखनौ येथे Backward Classes च्या सभेत ओबीसी ना आवाहन केले होते, “Why not you Backward Class & we scheduled class should come together and capture the political power of India. ”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Annihilation of Cast  मध्ये ‘ब्राम्हणी हिंदुइझम’ मांडण्याचे सामर्थ्य केवळ भारतातील ब्राम्हणी-अहिंदू-आदिवासी मधेच आहे, असे डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले होते. गेल्या ६० वर्षात तथाकथित डाव्या आणि संघीय NGO नी आदिवासींना नेस्तनाबूत करणेच बाकी ठेवले आहे. आणि फुले-शाहू-पेरियार-नारायण गुरु सारख्या महामानवांना जन्म देणारा ओबीसी हा परिवर्तनवादी चळवळीपासून लांब गेला. याची कारणे शोधून त्यावर उपाय शोधल्याशिवाय ओबीसी, आदिवासी तसेच एस.सी. चे खरे हित होणार नाही हे किमान चळवळीचे म्होरके म्हणवणाऱ्यानी तरी समजून घेण्याची गरज आहे.

मा. महादेव जानकर
भारतात फुले-शाहू-आंबेडकर अशी एक परंपरा आणि एक आघाडी आहे. तशीच मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर यांचीही एक परंपरा आणि आघाडी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार करणारी मानवतावादी परंपरा आणि मानवी मुल्यांचा विरोध करणारी मनुवादी परंपरा यामध्ये कैक वर्षापासून लढा चालू आहे. यामध्ये मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर परंपरा मजबूत झाल्याचा पुरावा ठायी-ठायी नजरेला येतो. डॉ. आंबेडकरांचे नाव व नावासहीत थोडा वारसाही जिवंत ठेवण्यात दलित यशस्वी झाले आहेत. परंतु फुलेंचे नाव आणि वारसा दोन्हीही जिवंत करण्याची गरज आहे. आदिवासींना बरोबर घेणारी चळवळ राबवण्याची गरज आहे. भारतातील दलित-ओबीसी-आदिवासीसहित धार्मिक अल्पसंख्यांक एकत्र घेवून जाणारी चळवळ बांधण्याची गरज आहे. सामाजिक चळवळीला मर्यादा येतात. काही काळ त्या टिकतात. राजकीय चळवळीतून मात्र सामाजिक चळवळीला गती येवू शकते. ती जास्त काळ टिकू शकते. ही राजकीय चळवळ प्रस्थापित राजकीय चळवळीपासून अलिप्त-स्वतंत्र असली पाहिजे. काशीराम आणि बसपा ने हा प्रयोग यशस्वी करून दाखवल्याचे दिसते. बहुजन राष्ट्रीय समाज मोठा आहे. भारताच्या ९० % त्यांची संख्या आहे. मनुवादी व्यवस्थेकडे ही मते मिळवण्यासाठी वेगवेगळया ‘मुखवट्याचे’ अनेक पक्ष आहेत. (काँग्रेस, भाजपा, शिवसेना). मानवतावादी मुखवटा धारण करून ‘मनुवादी’ कार्य करणाऱ्या संघटनाही यांच्याकडे आहेत. बसपा ही दलित-बेस पार्टी आहे. मनुवादी राजकारणाला शह देण्यासाठी ‘ओबीसी-आदिवासी’ राष्ट्रीय समाज पार्टीची स्थापना मी केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचा झेंडा धरणाऱ्या ब्राम्हणानाही माझ्या पक्षात स्थान आहे. रासपा ओबीसी-आदिवासी समाज घटकाइतकीच दलित-अल्पसंख्यांकाची पार्टी आहे.

रासपा ‘राष्ट्रीय समाज’वादी असली तरी सर्व भाषीय, सर्व प्रांतीय, सर्व प्रादेशिक, सर्व धर्मियांना ‘समान’ लेखणारी, सन्मान बाळगणारी, त्यांच्या समस्यांना आपली समस्या मानणारी पार्टी आहे. रासपा जात-धर्म-भाषा-प्रांत निरपेक्ष पार्टी आहे. संघटनात्मक लोकशाही मानणारी पार्टी असल्याने पक्ष वाढीसाठी समाज हितासाठी आवश्यक बदल स्वीकारणारी, तसं बदल घडवून आपल्या कार्यकर्त्यासाठी पूर्ण वाव आणि स्वातंत्र्य देणारी पार्टी आहे.

रासपा मानवतावादी पार्टी आहे. फुले-शाहू-आंबेडकरांची परंपरा मानणारी पार्टी आहे. २०० पेक्षा जास्त राष्ट्रीय महापुरुषांचा आदर्श घेवून चालणारी पार्टी आहे. मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर परंपरांशी लढा देण्यासाठी सज्ज असलेली पार्टी आहे. भारताच्या राज्य घटनेमुळे निवडणूक लढवून भारताची सर्वोच्च सत्ता घेण्याची संधी मिळाली आहे. मत अधिकार नावाचे सर्वात मोठे शस्त्र ९० % राष्ट्रीय समाजाच्या हातात आहे. परंतु भारताच्या राजकीय पटलावर अनेक मनुवादी पक्षच पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. काही मानवतावादी पक्ष दिशाहीन झाल्यामुळे, विकले गेले, वा दुबळे झाले आहेत, होत आहेत. काही पक्ष आजही प्रामाणिकपणे लढत आहेत.

राष्ट्रीय समाज पार्टी देखील स्पष्ट ध्येय, लक्ष समोर ठेवून आपल्या समाजाच्या, राष्ट्रीय समाजाच्या आधारावर मुंबई-दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्याचा इरादा घेवून लढत आहे. निर्णायक पहिले पाऊल यशस्वी टाकले आहे. ‘येल्डा’ pattern द्वारे दुसरे यशस्वी पाऊल टाकले आहे. दिल्लीच्या संसद भवनात ‘राष्ट्रीय समाजाचा’ आवाज बुलंद करणार आहे.

मनु आणि मानवाचा तसा डिक्शनरी अर्थ एकच आहे. परंतु सामाजिक, सांकृतिक संदर्भ लक्षात घेता मनुवाद आणि मानवतावादी हे शब्द परस्पर कट्टर विरोधक बनले आहेत. तात्पर्य नावापेक्षा अर्थ महत्वाचे आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष नावापेक्षा अर्थ घेवून पुढे जाणारा राजकीय पक्ष आहे.

0 comments: